बद्रीनाथ, गढवाल, उत्तराखंड
परिचय
हिमालयाच्या
पर्वतराजीमध्ये देवदेवतांचा युगानुयुगे निवास
आहे अशी भारतीयांची
अढळ श्रद्धा आहे.
हिमालय हा देवतात्मा
आहे आणि त्यात
ही गढवाल-कुमाऊ
म्हणजे साक्षात देवभूमी
आहे. याच गढवाल
आणि कुमाऊच्या सीमेवर,
हिमालयाच्या प्रांगणात, देवदार वृक्षांच्या
सावलीमध्ये, अलकनंदेच्या नील-धवल खळखळत्या प्रवाहाच्या काठावर
भगवान श्री विष्णूचे
परम धाम म्हणजेच
बद्रीनाथ आहे.
ऋषिकेशच्या अध्यात्मप्रवण पवित्र स्थानी गंगा नदी शेकडो लहरींनी भक्तांना आशीर्वाद देते. तिथून पुढे हिमालयाच्या अंतरंगात प्रवास करताना पहिला थांबा म्हणजे देवप्रयाग, जिथे भागीरथी नदीचा संथ खोल प्रवाह फेसाळत्या अलकनंदेला मिळतो. या भागीरथीच्या तीराने उत्तर दिशा गाठली कि गंगोत्री-गोमुख म्हणजे श्री गंगेचा उगम दृष्टीपथात येतो. देवप्रयाग होऊन पुढे गेले की लागते रुद्रप्रयाग, जिथे डौलदार वळणे घेत येणाऱ्या मंदाकिनी चा प्रवाह अलकनंदा सामावून घेते. ह्या मंदाकिनी च्या तीराने उत्तरेस प्रवास केला कि येते श्रीमहादेवाचे परमस्थान केदारनाथ. आणि मग अलकनंदेच्या तीराने आपण उत्तरेकडे निघालो कि पोचतो बदरीकावनातील म्हणजे बोरीच्या वनातील नारायणाच्या निवासस्थानी म्हणजे अर्थात बद्रीनाथ !
उत्तराखंड
मधील चमोली जिल्ह्ययातले
बद्रीनाथ हे तीर्थक्षेत्र. गावाप्रमाणेच जवळच्या २३००० फूट
उंच हिमाच्छादित पर्वतशिखराचे
नाव हि बद्रीनाथच
आहे.
स्थापत्य
वैष्णव संप्रदायातील १०८ दिव्य देसम म्हणजे पवित्र
वैष्णव तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणजे बद्रीनाथ! सहा महिने बर्फाच्छादित राहणाऱ्या या
मंदिरात सहा महिन्यात सुमारे ८५ लाख भाविक येतात. योग मुद्रेतील विष्णू इथे विराजमान
आहेत. मागच्या दोन हातात शंख चक्र धारण केले असले तरी समोरचे दोन हात योग मुद्रेत
आहेत. अलकनंदा नदीकाठी हिमालयाच्या गढवाल रांगांमधे हे अतिप्राचीन तीर्थक्षेत्र आहे.
विष्णू पुराण, स्कंद
पुराण आणि तमिळ अलवार संत साहित्यात बद्रीनाथ मंदिराची माहिती येते. आदि
शंकराचार्यांनी या मंदिराच्या उभारणीसाठी इथे वास्तव्य केले होते.
सुमारे इ.स. आठव्या शतकात परमार राजा कनकपाल यांनी
बांधलेल्या या मंदिराच्या देखभालीसाठी बाजूची गावे दान दिली. परमार राजांच्या
शिलालेखात बद्रीनाथाचे व मंदिराचे उल्लेख सापडतात.
गाभारा, अंतराळाच्या जागी आयताकार दर्शन मंडप आणि पुढे सभा मंडप
असे मंदिराचे मुख्य भाग आहेत. काहीशा उंच अधिष्ठानावर बांधलेल्या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढून जावे लागते.
मंदिराभोवती विस्तृत आवार आहे.
गाभाऱ्यावर परमार मंदिर शैलीशी मिळतेजुळते नागर पद्धतीचे शिखर आहे. पन्नस फूट उंच चौरसाकार शिखरावर चारही बाजूंनी मधोमध रहपग आहे. त्यामुळे शिखराचे उभे तीन भाग होतात. वर आमलक आहे. मात्र गढवाल शैलीनुसार त्याभोवती चौरसाकार लाकडी छत्र बांधले आहे. शिखर आणि आमलक यांच्या मधल्या भागाला स्कंध म्हणतात. त्यावर हे चौकोनी लाकडी छत्र पक्के बसवले आहे. त्यावर सोन्याचा कळस आहे.
मुख्य मंदिरात गाभाऱ्यात जाताना
अंतराळ आहे त्याला दर्शन
मंडप म्हणतात. इथे कुबेर, नारद, उद्धव, नर नारायण यांच्या मूर्ती आहेत. सभा
मंडपात सुंदर
कोरीवकाम केलेले खांब आहेत.
मुख्य मंदिराच्या अधिष्ठानावरून खाली उतरल्यावर पूर्ण
मंदिराला प्रदक्षिणा घालू शकतो असे विस्तृत मोकळे आवार आहे. या मोकळ्या जागे पलिकडे
लहान मोठी पंधरा मंदिरे आहेत. त्यात लक्ष्मी नृसिंह, आदि शंकराचार्य, लक्ष्मी, गरूड, नवदुर्गा, रामानुजाचार्य यांच्या मूर्ती आहेत. ही सर्व मंदिरे काळ्या
पाषाणाची आहेत. मुख्य बद्रीनाथ मंदिरदेखील काळ्या पाषाणाचे आहे. या सर्व परिसराभोवती भक्कम तट
बांधलेला आहे. या तटाला एक प्रवेशद्वार आहे जे वैशिष्ट्यपूर्ण गढवाली शैलीत बांधलेले आहे. पायऱ्या
चढून या प्रवेशद्वारातून आत जाताना विष्णूवाहन गरुडाचे दर्शन होते. दक्षिण भारतातील
द्रविड मंदिर स्थापत्यात प्रवेशद्वार भव्य आणि सुंदर नक्षीकामाने नटलेले असते
ज्याला गोपुर म्हणतात. महाराष्ट्रातील सतराव्या अठराव्या शतकातील मंदिरांना प्रवेशद्वारावर
कमानींनी सजलेल्या खोल्या असतात. त्यामधे नगारखाना असतो. तशीच रचना बद्रीनाथ मंदिराच्या
प्रवेशद्वारावर दिसते. सुंदर कमानी, आकर्षक रंगांनी रंगवलेली चित्रे आणि खिडक्यांनी
सजलेले हे प्रवेशद्वार लाकडाचे आहे. त्यावरच्या तरंगहस्तांवर हत्ती, मोर, हंस अशा शुभ मानलेल्या
प्राण्यापक्ष्यांची शिल्पे आहेत.
बद्रीनाथ मंदिराच्या बांधकामासाठी विचारपूर्वक दगड आणि
लाकडाचा वापर केला आहे.
आठव्या शतकात बांधलेल्या मूळ मंदिरावर वेळोवेळी नैसर्गिक
आघात झाले त्यामुळे नंतरच्या काळात पुन्हा बांधकाम करावे लागले. सोळाव्या शतकात
गढवाल घराण्याचे शासक अजयपाल यांनी आवारातील बरेच काम केले होते. परत सन १८०३ मधे
झालेल्या भयंकर भूकंपाने मंदिराचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी जयपूरच्या महाराजांनी
दुरुस्ती व पुनर्रचना केली. आजही बद्रीनाथ मंदिराच्या देखभालीची जबाबदारी गढवालचे परमार
आणि त्रावणकोरचे राजघराणे यांचा समावेश असलेल्या कमिटीकडे आहे.
उत्सव आणि परंपरा
भक्त - आणि देव यामध्ये ज्यावेळी
निसर्गालाही सहभागी करून घेतले जाते आणि
निसर्गाच्या नियमित प्रक्रियेला उत्सवी जोड दिली जाते तेंव्हा वैदिक साहित्यात
वर्णन केलेले ऋत म्हणजे निसर्गनियम आणि
सत्य म्हणजे परमेश्वर यांचे परस्परांशी
असलेले नाते आपल्याला सहज अनुभवता येते . ही प्रचिती देणारे बद्रीनारायणाचे मंदिर
!
दिवाळी हा येथील विशेष उत्सदव मनाला जातो कारण
दिवाळीनंतर येथील मंदिर बंद केले जाते . त्याचीही विशिष्ट पद्धती आहे .
सर्वात आधी या मंदिर परिसरातील श्री गणेशाचे
मंदिर विधीवत पूजा करून बंद केले जाते . त्यानंतर आदी केदारेश्वर मंदिर बंद होते . चार दिवस चालू असलेल्या या
उत्सवात मंदिर बंद करण्यापूर्वी वेदमंत्रांचे येथे सुरु असलेले पठण काही काळासाठी
थांबविण्यात येते त्याआधी ग्रंथपूजन केले जाते . नारायणासह दीर्घकाळ एकांतात निवास करण्यासाठी देवीला आमंत्रित केले
जाते आणि तिला विशेष नैवेद्य दाखविला जातो . शेवटच्या दिवशी येथील पूजेचा मान
असलेल्या रावळ जमातीच्या पुरोहितांकडून
विशेष पूजा केली जाते जिला ‘सखी- भाव पूजा’ म्हटले जाते . हे पुरोहित स्त्रीचा वेष
परिधान करून देवीची मूर्ती वाजतगाजत आणतात आणि तिला बद्रीनारायणाशेजारी विराजमान
करतात . त्यानंतर तुपात भिजविलेले एक लोकरीचे उबदार कांबळे देवतेभोवती लपेटून
ठेवले जाते आणि नंतरच फुलांनी सजविलेल्या मंदिराची दारे दीर्घकाळासाठी बंद केली जातात
. येथील उद्धव आणि कुबेर यांच्या मूर्ती वाजतगाजत पांडुकेश्वर या ठिकाणी आणल्या
जातात . पांडुकेश्वर हा परिसर सुद्धा
मंदिरांनी समृद्ध आहे.
मंदिर उघडण्याचा विधी झाल्यावर सर्वप्रथम
देवावरील कांबळे काढले जाते आणि उब देणाऱ्या तीळाच्या तेलाने अभिषेक केला जातो . त्यांनतर नेहमीचे
पूजा उपचार केले जातात . नारायणाला वस्त्रे , दागिने
घातले जातात आणि मंदिर सर्व भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाते . मूळ मंदिरातून
बाहेर आणलेल्या देवता पुन्हा आपापल्या मंदिरात विधीवत नेऊन स्थापन केल्या जातात .
याजोडीने कृष्णजन्माष्टमीचा उत्सवही येथे उत्साहाने साजरा केला जातो .
वेधक आणि वेचक
- ·
बद्री विशाल म्हणजेच बद्रीनाथ, योगध्यान
बद्री (हिवाळ्यातील बद्रीनाथ धाम), भविष्य बद्री , वृद्धबद्री, आदीबद्री हि हिमालयातील पंचबद्री विष्णूस्थाने बद्री परिक्रमेचा
भाग आहेत. पंचबद्री तसेच पंचकेदार ह्या हिमालयातील
महत्वाच्या शिव आणि विष्णू परिक्रमा आहेत
- · बद्रीनाथाच्या मंदिरातील पुजारी, अर्चक हे केरळमधील नंबुद्री ब्राहमण असतात
उपसंहार
बद्रीनाथ हे भारतीयांच्या अध्यात्म यात्रेचे निजधाम आहे. साक्षात लक्ष्मी -नारायणाचे निवासस्थान, अलकनंदा म्हणजेच गंगा नदीचे सदा सानिध्य आणि देवतात्मा हिमालयाचे प्रबळ संरक्षण असे कोंदण लाभलेले तीर्थस्थान नक्कीच श्रेष्ठ ठरते



खुपच छान माहितीपूर्ण आहे ब्लॉग
ReplyDelete